खारघर/प्रतिनिधी,दि.२१- धर्माच्या नावाखाली कोणतीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, कायदा व सुव्यवस्था पाळलीच पाहिजे, असे ठाम मत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी पनवेल दौऱ्यादरम्यान व्यक्त केले. अनधिकृत भोंग्यांमुळे वाढणाऱ्या ध्वनीप्रदूषणावर आणि नागरिकांच्या नाराजीवर त्यांनी चिंता व्यक्त करत प्रशासनाने या संदर्भात ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली. महाराष्ट्र भोंगा मुक्त मोहिमेला गती देण्यासाठी किरीट सोमय्या यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत पनवेलचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे, कळंबोली पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते आणि तळोजा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांची भेट घेत शहरातील अनधिकृत भोंगे हटवण्याची मागणी केली. किरीट सोमय्या यांच्या मागणीला पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, येत्या आठ दिवसांत कारवाई करून अनधिकृत भोंगे बंद करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, नरेश ठाकुर, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, बबन मुकादम, गुरुनाथ गायकर, कळंबोली शहर मंडळाचे माजी अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार, मंडल सरचिटणीस दीपक शिंदे, मंडल उपाध्याक्ष किरण पाटील, निर्दोष केणी, अमर उपाध्याय, वासुदेव पाटील, कीर्ति नवघरे, शैलेंद्र त्रिपाठी, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, एस. एस. गांगुर्डे, कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण, उप विभाग अधिकारी मिलिंद चव्हाण, सहाय्यक अभियंता प्रज्ञा पाटील आदी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment